
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
स्वामी रामानंद तीर्थ (एसआरटी) रुग्णालय परिसरातील बँक ऑफ इंडिया (बीओआय)चे एटीएम मशीन गेल्या काही दिवसांपासून सतत बंद अवस्थेत असल्याने रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या सामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
रुग्णालयात दाखल असलेल्या पेशंटच्या नातेवाईकांना औषधे, तपासण्या व इतर तातडीच्या खर्चासाठी रोख रकमेची आवश्यकता असते. मात्र एटीएम बंद असल्यामुळे त्यांना शहरात इतरत्र जाऊन पैसे काढावे लागत असून वेळ व पैशांचा अतिरिक्त खर्च सहन करावा लागत आहे. विशेषतः ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना याचा अधिक फटका बसत आहे.
अनेक वेळा आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ रोख रक्कम आवश्यक असताना एटीएम बंद असल्याने नातेवाईकांची धावपळ होत आहे. त्यामुळे रुग्णसेवेवरही अप्रत्यक्ष परिणाम होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
या पार्श्वभूमीवर बीओआय बँक प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन एटीएम मशीन नियमित सुरू ठेवावे व योग्य देखभाल करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
