परळी प्रतिनिधी :-
परळी तालुक्यातील जळगव्हाण येथील रत्ननगर तांडा येथे कौटुंबिक वादातून भीमराव शिवाजी राठोड (वय २६) या तरुणाची कोयत्याने सपासप वार करून हत्या झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी उघडकीस आली. आरोपी अनिल बाबासाहेब चव्हाण हा फरार झाला असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.
परळी तालुक्यातील घटना
मिळालेल्या माहितीनुसार, मयत भीमराव राठोड व आरोपी अनिल चव्हाण यांच्यात काही दिवसांपासून घरगुती कारणावरून वाद सुरू होता. या वादातूनच अनिलने भीमरावचा खून करण्याचा कट रचला. गुरुवारी त्याने भीमरावला रत्ननगर तांड्यावर बोलावून पुन्हा बाचाबाची केली. हा वाद झटापटीत बदलताच अनिलने कोयत्याने भीमरावच्या डोक्यात वार करून जागीच ठार मारले.
घटनेनंतर आरोपी अनिल चव्हाण घटनास्थळावरून पसार झाला. माहिती मिळताच सिरसाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे व तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.